भाजपकडे माथा टेकवण्यायोग्य नेत्याचे स्मारक नसणे हा संघाच्या विचारधारेचाच पराभव...!
केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणेंनी आपल्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात हिंदुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर माथा टेकवून केली. त्यानंतर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडुन व दुधाचा अभिषेक करून स्म्रुतीस्थळाच्या जागेचे शुद्धीकरण केले. स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्या शिवसैनिकांची कृती म्हणजे एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. शिवसेनेवर टिका करताना देवेंद्र फडणवीस एक गोष्ट विसरले की जनआशीर्वाद यात्रा हा सरकारी कार्यक्रम नसुन भारतीय जनता पक्षाचा पक्षीय कार्यक्रम आहे. बाळासाहेब ठाकरे हे जरी हिंदुह्रुदयसम्राट असले तरी ते शिवसेनाप्रमुख आहेत, ही गोष्ट राजकारणात विसरून चालणार नाही. एरव्ही निव्वळ श्रद्धेपोटी कोणत्याही पक्षाच्या नेत्याने शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंच्या स्म्रुतीस्थळावर आदराने माथा टेकवणे किंवा नतमस्तक होणे यात काहीही वावगे नाही. त्यावर शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला किंवा अगदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. मात्र जनआशीर्वाद यात्रा या भारतीय जनता पक्षाच्या पक्षीय क...